कोळेश्र्वर ते कमळगड ट्रेक १७.०१.२१
९-१० जानेवरीचा रायरेश्वर- कोळेश्वर- ऑर्थरसीट पॉइंट, महाबळेश्वर
असा लांबलचक ट्रेक पावसामुळे रद्द करावा लागला. पण लगेचच १७ जाने चा कोळेश्र्वर - कमळगड
हा त्याच भागातला ट्रेक ठरला. रविवारी ठरल्याप्रमाणे पहाटे ४ वाजता दांडेकर पुलावर(pick
up) जाऊन थांबलो. बरोब्बर ४.२० ला बस पकडली आणि पुढचे pick up घेत घेत बस लगेचच पुणे
बंगलोर हायवेला साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाई येई पर्यंत मस्त झोप झाली. वाईच्या
गणपतीचे दर्शन घेऊन, जोर ह्या कोळेश्र्वर च्या पायथ्याच्या गावी ८.३० ला पोचलो. इथे
आमच्या ग्रुप लीडरने ट्रेकची संपूर्ण माहिती दिली आणि ९ वाजता आम्ही डोंगर यंगायला
सुरुवात केली. सुरवातीलाच जबरदस्त घामटे काढणारी चढाई होती. ऊन खूप होतं पण झाडी खूप
असल्यामुळे ते तितकेसे जाणवले नाही. कुठेही जराशी पण सपाट सरळ वाट नव्हती, सतत चढण.
पण कुठेही न थांबता आणि पाण्याचा एक थेंबही न पीता, ही चढाई आम्ही १.३० तासात पूर्ण
केली.
वर आल्यावर, झाडांच्या सावलीत बसून आधी मनसोक्त पाणी प्यायलो आणि मग पोटपूजा केली. तो पर्यंत मागे राहिलेली मंडळी थोड्या थोड्या वेळाने येत होती. सगळे वर येई पर्यंत थोडी विश्रांती घेतली, फोटो काढले. वर नजर जाईल तिथपर्यंत झाडी भरलेले पठार होते. सकाळचे ११ वाजले होते. खाली आमच्या लीडरने सांगितले होते की कोळेश्र्वर पठार आणि कमळगड मधे एक खिंड आहे. तिथं पर्यंत जर आपण ३/३.३० पोचलो तरच कमळगडावर जाऊन येता येईल अन्यथा कमळगड बघण्याचा विचार सोडावा लागेल. म्हणून मग आमच्या वाटेपासून जरा बाजूला असलेल्या कोळेश्र्वर मंदिरात जाण्याचा विचार बाजूला सारला.
इथून पुढे भरगच्च जंगलाने वेढलेले लांबलचक कोळेश्र्वर पठार होते.
असंख्य प्रकारची नैसर्गिकरीत्या उंच उंच वाढलेली झाडं होती, वेली होत्या, खूप साऱ्या
पांढऱ्या फुलांची पखरण होती, उंचीची तमा न बाळगता वाढलेली कारवीची जंगले होती, लांबवर
पसरलेले फर्न वनस्पतीचे जंगल होते, मधूनच पक्षांचे आवाज येत होते. माणसाचा मात्र जराही
मागमूस नव्हता. वाटेत एका झर्यावर मस्त थंडगार पाणी प्यायलो आणि आमच्या रिकाम्या झालेल्या
पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. मी तर अर्धी झालेली बिसलेरी ची बाटली ओतून झऱ्याचे
रुचकर थंड पाणी भरून घेतले.
अडीचतास कुठंही ब्रेक न घेता चालत, १.३० वाजता आम्ही धनगर वाडीत
पोचलो. डोळ्यांना सुखावणारी, लांबवर पसरलेली सोनेरी, पोपटी गव्हाची शेतं होती. मधोमध
त्यांची कौलारू घरं होती. अगदी फोटो परफेक्ट जागा होती, त्यामुळे ह्या ठिकाणी फोटो
न काढणारा विरळाच. शेताच्या एका बाजूला खळ्यासाठी मोकळी जागा होती, तिथे सगळ्यांनी
डबे उघडुन मस्त पोटपूजा केली. आता २ वाजले होते. पुढचा खिंडी पर्यंतचा टप्पा लवकर पार
करायचा होता. मग काय, वेगवान चालीने डोंगर वाटा पार करत, जिथे दोन वाटा दिसतात तिथे
मागून येणाऱ्या लोकांसाठी, चुकीची वाट झाडांच्या वाळक्या फांद्यांनी बंद करत, हातातल्या
खडूंनी वाटेतल्या दगडांवर योग्य मार्ग दर्शवत, झाडांवर मार्ग दर्शक रीबिनी बांधत, तास सव्वा तासात खिंडीत पोचलो. (एक लिहायचे राहिले,
जोर गावातून आम्ही एक डोंगर मित्र बरोबर घेतला होता जो आम्हाला वाट दाखवत होता).
वाटेत एका ठिकाणाहून, इतक्या वेळाने कमळगडाचे प्रथम दर्शन झाले. खिंडीतून गडावर जाऊन, खिंडीत परत येण्यासाठी दीड तास पुरेसा आहे. वाटेत आधी एक गोरखनाथांचे सुरेख मंदिर लागते आणि पुढे गड चढण्याआधी एकुलती एक झोपडी लागते. इथे राहण्याची/जेवणाची व्यवस्था, तेथील शेतकरी कुटुंब करते.
साधारण ४२०० फूट उंचीच्या ह्या किल्ल्याला प्रवेशद्वार किंवा बुरुज
वगेरे असे काहीही नाही. वर जमीन चिरत गेलेले ४०-५० फूट खोल असे एक भुयार आहे, तीच गेरूची
किंवा कावेची विहीर. खाली उतरायला पन्नासेक उंच पायऱ्या आहेत. बाजूला एक जाड लोखंडी
तार बांधली आहे, ज्याला धरून आपण विहिरीत उतरू शकतो. पायऱ्या ओलसर गेरू मुळे थोड्या
घसर्ड्या आहेत. खाली उतरत जाताना थंडावा वाढत जातो. तळाशी पोचल्यावर बऱ्याच कपारी दिसतात ज्यात गेरुची
लाल ओलसर माती दिसते. विहिरीतून वर आल्यावर हात गेरुमुळे लालेलाल होतात.
गडावरून दिसणारा नजरा केवळ अप्रतिम. महाबळेश्वर पाचगणी चा परिसर,
भोवतालची अतिशय दाट जंगले, रायरेश्वर चे पठार, केंजळगडचे नयनरम्य दर्शन होते. गडाच्या
तिन्ही बाजूंनी धोम धरणाचा तर एका बाजूने बलकवडे धरणाचा जलाशय दिसतो.
वरती अर्धा पाऊण तास थांबून, आलेल्या वाटेने अर्ध्या तासात परत खिंडीत पोचलो. अजुन बरेच लोक येणे बाकी होते. आमच्या वाटाड्याला बरोबर घेऊन, मागच्या लोकांसाठी खडूने/झाडांना मार्ग दर्शक रिबिनी बांधत तासाभरात, बरोब्बर ४.३० वाजता खालच्या नांदवणे गावात पोचलो.
समोर मस्त जलाशय होता. मग काय मस्त थंडगार पाण्याने फ्रेश झालो. काही जणांना डुंबायचा मोह आवरला नाही. बाकीची मंडळी अजुन वरून येत होती. बाजूला एक छोटेसे सुंदर मंदिर होते. दर्शन घेऊन, तिथल्या पारावर निवांत बसलो. आजूबाजूचा परिसर खूपच रमणीय होता. सगळी मंडळी आल्यावर, मस्त गरमागरम चहा घेऊन, ६.३० ला पुण्याकडे मार्गस्थ झालो.
आमचा हा जो ट्रेकिंग ग्रुप आहे, ते बहुतांश घाट वाटांचे ट्रेक करतात.
मलाही सह्याद्रीतील घाटवाटा अनुभवायला खूप आवडतात. घाटवाटा बरोबरच तिथले निसर्ग सौंदर्य,
वाटावरची जंगलं, प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज, झुळझुळते झरे, त्यांचे थंडगार गोड मिठास
पाणी, वाटांवर भेटलेले मदतीसाठी तत्पर असलेले साधे डोंगरातले लोक, त्यांचा आपलेपणा
खूप भावतो.
No comments:
Post a Comment