Saturday, December 25, 2021

घोळ - वाघजाई घाट - तेल्याची नाळ - घोळ ट्रेक १९.१२.२०२१

 

घोळ - वाघजाई घाट - तेल्याची नाळ - घोळ ट्रेक १९.१२.२०२१

सह्याद्रीतल्या घाटवाटांचे ट्रेक म्हणजे मनाला अतीव आनंद देणारे. निसर्गाच्या अगदी जवळ नेणारे, निसर्गाशी एकरूप व्हायला लावणारे. इथे जाऊन इथला सुखवणारा नेत्रदीपक निसर्ग पाहून, आनंदीत रोमांचित न होणारा माणूस विरळाच. हां, मात्र त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, भरपूर पायपीट करायची तयारी असावी लागते. पण खरं सांगतो ह्या घाटवाटांमध्ये फिरताना, वेळ किती गेला आणि पायपीट किती केली ह्याचं भानच राहत नाही इतका तो निसर्ग आपल्याला भरभरून आनंद देतो. 

तर असाच एक सर्वांग सुंदर घाटवाटेचा ट्रेक करायचा योग आला तो आमच्या STF (Sahyadri Trekkers Foundation) मुळे. सकाळी बरोब्बर ४.४० ला ठरलेल्या वेळी आमचा शेवटचा पीक अप, वडगाव ब्रीजखाली घेऊन, आमची बस पानशेतच्या काठाने वळणावळणाच्या रस्त्याने घोळ ह्या वेल्हा तालुक्यातल्या गावाकडे निघाली. अडीच तीन तासांचा प्रवास करून, मधेच पानशेतला फोटोग्राफी करून ८.१५ ला आम्ही घोळला पोचलो. वेल्हा तालुक्यातले घोळ हे ३०-३५ घरांचे अतिशय टुमदार गाव. लोकसंख्या १०० च्या आसपास. गावातील तरुण मंडळी कामानिमित्त मुंबई/पुण्यात. गावात फक्त वयस्कर मंडळी. ट्रेकर्स ना मदत करणारी, वाट दाखवणारी. 


ट्रेकला न लागणारे जास्तीचे सामान बसमधेच ठेऊन, बॅगपॅक व्यवस्थित भरून गावातून पोळेकर मामांना वाट दाखवायला बरोबर घेऊन, आम्ही मंडळी ८.३०/८.४५ च्या सुमारास निघालो. पोळेकर मामा, वय वर्ष फक्त ६६, पिळदार पांढऱ्या मिशा, शरीरयष्टी अतिशय काटक, पायात slippers, हातात काठी आणि खांद्याला एक पिशवी अश्या वेशात वाट दाखवायला सर्वात पुढे. त्यांच्याही पुढे एक काळे भुभू, त्यानेही संपूर्ण ट्रेक आमच्या बरोबर केला. सुरवातीला १५-२० मिनिटांचा डांबरी रस्ता संपल्यावर ट्रेकची सुंदर वाट सुरू झाली.

सकाळच्या कोवळ्या उन्हात, सुखद थंड आणि आल्हाददायक वातावरणात ट्रेकची मस्त सुरुवात झाली. वाट सुरुवातीला काही काळ मोकळ्या रानातून निघाल्यावर मस्त दाट जंगलात शिरली. भरगच्च झाडोऱ्यामुळे ऊन अजिबातच लागत नव्हते. वाटेत काही ओढे, वॉटर फॉल पण लागले. पण सध्या त्यात पाणी नव्हते. ओढ्याच्या काठाने तर कधी दरीच्या बाजूने जाणारी वाट पार करताना मजा येत होती. तासाभराने सोनेरी गवताचे एक मोठे पठार लागले. मधोमध एकच झाड होते. वारा छान सुटला होता त्यामुळे डोलणाऱ्या गवतावर छान लाटा येत होत्या. संपूर्ण पठारभर पसरलेले सोनेरी गवत आणि त्यावरची अगदी आखीव रेखीव पायवाट अगदी ठसठशीत दिसत होती, जणू केसातला व्यवस्थित पडलेला भांग.





पठारावरून समोर कोकणदीवा किल्ला, त्याच्या उजवीकडे कावळ्या बावळ्याची खिंड तर डावीकडे गेळ्याचा बंडा स्पष्ट दर्शन देत होते. कोकणदीव्याला जायला घोळ गावातून वाट आहे. इथे पोटात थोडं इंधन भरून, मनसोक्त फोटोज् काढून अगदी अनिच्छेनेच पुढे निघालो. वाट पुढेही जंगलातूनच होती. छोटी छोटी निळी जांभळी नाजूक फुले जागोजागी दिसत होती. कोकणदीवा झाडांच्या अधूनमधून दर्शन देत होता. हीच वाट पुढे कुंभेवाडीला जाते म्हणून हिला कुंभ्याची वाट सुध्धा म्हणतात. गावकरी नेहमी लागणारे सामान सुमान कुंभेवाडीतून आणतात त्यामुळे वाट छान मळलेली आहे. 





तासाभराने परत एका ओढ्याकाठी थांबलो. ह्या ओढ्याला पाणी होते त्यामुळे रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या थोडे चाऊम्याऊ खाऊन पुढें निघालो. पुढे कुंभेवाडी बाजूला ठेवत उजवीकडे निघालो ते पुन्हा एकदा दाट जंगलात घुसलो. संपूर्ण दगडी ऊतरण होती. त्यामुळे loose rocks बघून काळजीपूर्वक उतरायला लागत होते. बडदेमाची जवळ पोचलो तेव्हा साडे बारा वाजून गेले होते. भूक तशी फार लागली नव्हती. पण पुढे दिड दोन तासांच्या पायपीटी नंतर तेल्याच्या नाळेची खडी चढाई चढायची होती आणि आणखी पुढे जाऊन जेवायला थांबलो असतो तर लगेच नाळ चढायला त्रास झाला असता त्यामुळे बडदेमाची जवळच मस्त झाडाखाली जेवणाचे डबे उघडले.

 




इथून पहिल्यांदाच कुर्डूगडाचे दर्शन झाले. दोन वर्षापूर्वी जुलै महिन्यात भर पावसाळ्यात धामणहोळहून लिंग्याघाट उतरून कुर्डूगडाला गेलो होतो आणि निसणीच्या वाटेने परत धामणहोळ गाठले होते ते आठवले. त्यावेळी लिंग्या घाटातला अजस्त्र धबधबा पाहिला होता आणि त्या धबधब्याच्याच वाटेने वाहत्या पाण्यातून घाट उतरला होता त्या आठवणीने रोमांच उभे राहिले. एक adventurous ट्रेक होता तो. 

असो, डबे खाऊन पुढे लगेचच मार्गस्थ झालो. वाट दाट जंगलातूनच होती. पुढे ते काळे भुभु, मामा, अय्यर(ट्रेक साथी) त्याच्या मागे मी आणि माझ्या मागे दोघे तिघे असे निमुळत्या जंगल वाटेने पुढे चाललो होतो. बाकी ग्रुप मागे होता. मला बाजूच्या दाट झाडीतून गुर गुर असा आवाज ऐकल्याचा भास झाला. मामा पण संशयाने बघून पुटपुटले जनावर आहे की काय म्हणून. पण लगेच झपाझप पुढे निघाले. आम्ही पण स्पीड वाढवला. काही अंतरावर जंगलात काही गावकरी कंदमुळे शोधत होती त्यामुळे हायसे वाटले. जंगल पार करत बोरमाचीला पोचलो तेव्हा १.३०/१.४५ झाले होते. ७-८ घरें होती. माचीवर मोजकीच माणसे होती. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. घरातल्या आयाबायांनी लगेच घरातून पाण्याचे हंडे आणून आम्हाला पाणी भरून दिले. खूप आपुलकीने विचारपूस केली. खूप प्रेमळ लोकं डोंगरात राहणारी. 



आता गाव पार करून १५-२० मिनिटात आम्ही तेल्याच्या नाळेत पोचणार होतो. वाट शेतातून जात होती. शेताच्या बाजूच्या झाडीत २ बैल चरत होते. त्यातला एक उधळला. तो इतक्या जोरात मुसंडी मारून आमच्या समोरून पळाला की क्षणभर कळलेच नाही काय होतंय ते. आमच्या पासून ५० फुटावर रागात जाऊन उभा राहिला. आमच्यात एकाने लाल रंगाचा टीशर्ट घातला होता. त्याला लगेच काही जणांनी तो काढायला सांगितला. कदाचीत तो रंग बघून बैल उधळला की काय म्हणून. पण खरंच प्रसंग बाका होता. मामांनी चुचकारून त्याला शांत करायचा प्रयत्न केला. तोपर्यंत हळूच आम्ही पुढे सटकलो. मागच्या मंडळींना वॉकीटॉकी वरून खबरदार करून आम्ही पुढे जाऊन थांबलो. 

आता आम्ही नाळेच्या पायथ्याशी होतो. सगळे आल्यावर नाळ चढायला सुरुवात केली. छोट्या मोठ्या दगड धोंड्यांनी बनलेली. पाय देण्यासाठी, सुटलेले दगड काळजी पूर्वक avoid करत चढावे लागत होते. चढण पण कसली, अगदी छातीवर येणारी वळणावळणाची. त्यामुळे आम्ही फटाफट उंची गाठत होतो. ज्यांना सवय नाही, त्यांच्या गुडघ्यावर ताण येणं, पायात गोळे येणे असे होते. सतत वर न बघता व्यवस्थित पायाखाली बघून चढत गेल्यास दडपण येत नाही. वर पाहिल्यास, अजुन खुप चढायचंय म्हणून दडपण येते. मामा मात्र (वय फक्त ६६) वेगाने वर वर चढत होते.  नाळ संपायला आल्यावर थोडे थांबलो. पाणी ब्रेक घेतला. फोटो सेशन केले. वरून दिसणारा नजारा मात्र अप्रतिम होता. कुर्डूगड अजुन स्पष्ट दिसत होता. पुढच्या 15 मिनिटात नाळेचा टॉप गाठला. तासभर लागला संपूर्ण नाळ चढायला.





मागची लोकं अजुन बरीच मागे होती. एका मुलीच्या पायाला cramp आला होता. आम्ही न थांबता पुढे जायचे ठरवले. पुढच्या पाऊण तासात म्हणजे 4.15 वाजता घोळ गावात पोचलो. हापश्याचे पाणी उपसून मस्त फ्रेश झालो. थोड्या थोड्या वेळाने बाकीची मंडळी येत राहिली. सगळी मंडळी यायला 5.30 वाजले. मस्त गरमा गरम चहा पिऊन 6 वाजता पुण्याकडे रवाना झालो. 8 तासांची निसर्गाच्या कुशीतली पायपीट एक वेगळेच समाधान देऊन गेली त्यामुळे ट्रेकच्या आठवणी घोळवत बसमध्ये झोपेच्या अधीन केव्हा गेलो ते कळलेच नाही. जागा झालो तेव्हा बस खडकवासला पार करून पुण्यात शिरत होती आणि घड्याळात 9 वाजत आले होते.


 विवेक फाटक

Thursday, December 16, 2021

गोरखगड ट्रेक ३१.१०.२०२१

 

गोरखगड ट्रेक ३१.१०.२०२१

 

सदानंद हॉटेल बाणेर समोर, हायवेवर आमचा शेवटचा पीकअप घेत Zenith Odysseys ची बस पुढे एक्स्प्रेस वे लागली तेव्हा सकाळचे ६/६.१५ झाले होते. खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे लगेचच मस्त डोळा लागला. पुढे खोपोलीला एक्झीट घेऊन बस कर्जत मुरबाड रस्त्याला लागली. देहरी हे गोरखगडाच्या पायथ्याचे गाव. गावात पोचल्या बरोबर गोरखगड आणि मच्छिंद्रगड यांचे दोन अजस्त्र सुळके आपले लक्ष वेधून घेतात. गावात  चहानाष्टा घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. एव्हाना ९ वाजले होते. उन्हे तापायला सुरुवात झाली होती. 



ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्रीची रांग खूपच अजस्त्र वाटते. माळशेज घाट, जीवधन- नाणेघाट, आहुपे घाटातील अजस्त्र सुळके गगनाला भिडलेले दिसतात. आहुपे घाट आणि भीमाशंकरचे जंगल म्हणजे निसर्गाचे अद्भुत लेणं. ह्या जंगलातले गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे दोन उंच सुळके सह्यप्रेमींना नेहमीच साद घालतात. 

गडावर जाणारी वाट अतिशय दाट जंगलातून वर वर चढत जाते त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नाही. ही खडी चढण चढताना चांगलीच दमछाक होते, खूपच घामाघूम व्हायला होते. पण थोडे थोडे थांबत, थोडे पाणी पीत दाट झाडांमधून दिसणारी गोरखगडाची विविध रूपे बघत आपण वर चढत असतो. घामाघूम झालेलो असताना, येणारी गार वाऱ्याची झुळूक खूप सुखावून टाकते, वर चढायला नवा हुरूप देते. 



तास सव्वा तासांच्या चढाईनंतर आपण गोरखनाथांच्या मंदिरा जवळ येतो. येथे वनखात्याने ह्या गडाबद्दल माहितीवजा लावलेले एक दोन बोर्ड बघायला मिळतात. इथून पुढे आपण काही अर्धवट कातळ पायऱ्यावरून/ तर काही रॉक पॅचेस पार करत गडाच्या दरवाज्या पर्यंत येतो.  इथे एक छोटीशी गुहा आहे. त्या गुहेवरून एक मध्यमश्रेणीचा छोटासा रॉक पॅच पार करत, वर जायला वाट आहे. वर अतिशय मोठी थंडगार गुहा आहे. एखादा मोठा ग्रुप सुध्दा इथे रात्री मुक्काम करू शकतो. गुहे जवळच पाण्याची तीन टाकं आहेत. पैकी दोन मधे खूप शेवाळे आहे तर तीन पैकी पहिल्या टाक्यातील पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. पाणी अतिशय सुमधुर आणि थंडगार आहे. गुहेत थोडावेळ थांबून, अगदी जवळ दिसणाऱ्या मच्छिंद्रगडाचे यथेच्छ फोटो काढले. अतिशय रमणीय जागा आहे ही.




आता वर जायचा शेवटचा टप्पा थोडा अवघड आहे. त्यामुळे आमच्या पैकी दोघे जण गुहेतच थांबले. आम्ही आमच्या सॅक्स तिथेच ठेवल्या. वर जाणाऱ्या ह्या टप्यावर निमुळत्या सरळसोट पायऱ्या आहेत, काही ठिकाणी तुटलेल्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला खोबण्या केलेल्या आहेत. त्याचा आधार घेत आपण वर चढतो. एका बाजूला उभा कातळ आहे तर दुसऱ्या बाजूला दरी. त्यामुळे काळजीपूर्वक वर चढावे लागते. उंचीची भीती किंवा दृष्टिभय असणाऱ्यांसाठी कठीण आहे.





हा टप्पा अवघड असला तरी तो चढल्या शिवाय गडमाथ्यावरून दिसणाऱ्या अप्रतिम आणि अफाट  निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येणार नाही. गडमाथ्याचा घेरा फार मोठा नाहीये. वर शंकराचे एक छोटेसे देखणं मंदिर आहे, समोर नंदी आहे. मंदिरा मागून जो काही सह्याद्रीचा नजारा आहे त्याच्या शब्द नाहीत. आकाशाला गवसणी घालणारे बेलाग कडे, सिध्दगड, मच्छिंद्रगड, आहुपे घाट, नाणेघाट, भीमाशंकरचे घनदाट जंगल आणि निशब्द शांतता. इथे खूप वेळ घालवावासा वाटत होता पण भरपूर फोटोग्राफी करून खाली उतरायला घेतले. हा टप्पा चढण्यापेक्षा उतरायला अवघड आहे. अतिशय काळजीपूर्वक उतरून आम्ही पुन्हा खाली गुहे जवळ आलो. रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या, सॅक पुन्हा चढवून उतरायला सुरुवात केली. एक वाजून गेला होता. सूर्यदेव आग ओकत होते( ऑक्टोबर हीट). कातळटप्पे उतरताना, कातळ चांगलाच गरम झाल्यामुळे हात खूपच भाजत होते.  त्यातच एक कुत्र्याचे पिल्लू वर कसे काय आले कोण जाणे, त्याला वर काही खायला मिळणार नाही म्हणून आमच्यातील श्वानप्रेमींनी त्याला खाली गोरखनाथ मंदिरापर्यंत उचलून आणून सोडले. त्याला घेऊन उतरणे अवघड होत होते. पाठीवरच्या सॅक मधे तोंड बाहेर ठेऊन बसवायचा प्रयत्न पण झाला. पण ते पिल्लू त्यात बसेना. खाली मंदिरा जवळ त्याला खायला प्यायला दिले. आम्हीही पाणी पिऊन ताजेतवाने झालो. दुपारचे दोन वाजले होते. 




आता इथून नॉन स्टॉप उतरायचे ठरवले. कारण आता बहुतेक संपूर्ण उतारच होता आणि दाट जंगल होते त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता. त्यामुळे सुसाट निघालो. पिल्लू पण आमच्या पाठोपाठ उतरत होते. उतरताना काहींची घसरगुंडी पण झाली. शेवटच्या टप्प्यावर थोडी वाट चुकलो पण खाली मेन रोड दिसत होता, गाड्यांचे आवाज येत होते. त्यामुळे थोडा टाईम पास होत ३ वाजता गावात पोचलो. पिल्लाला पण गावात सोडले. फ्रेश होऊन मस्त जेवण केलं आणि ४ वाजता पुण्याकडे मार्गस्थ झालो. वाटेत कर्जतला प्रसिद्ध वडापाव चहा घेऊन पुण्यात घरी ९.३० पोचलो.