Monday, October 18, 2021

कोळेश्र्वर ते कमळगड ट्रेक १७.०१.२१

 

 कोळेश्र्वर ते कमळगड ट्रेक १७.०१.२१

 

९-१० जानेवरीचा रायरेश्वर- कोळेश्वर- ऑर्थरसीट पॉइंट, महाबळेश्वर असा लांबलचक ट्रेक पावसामुळे रद्द करावा लागला. पण लगेचच १७ जाने चा कोळेश्र्वर - कमळगड हा त्याच भागातला ट्रेक ठरला. रविवारी ठरल्याप्रमाणे पहाटे ४ वाजता दांडेकर पुलावर(pick up) जाऊन थांबलो. बरोब्बर ४.२० ला बस पकडली आणि पुढचे pick up घेत घेत बस लगेचच पुणे बंगलोर हायवेला साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाई येई पर्यंत मस्त झोप झाली. वाईच्या गणपतीचे दर्शन घेऊन, जोर ह्या कोळेश्र्वर च्या पायथ्याच्या गावी ८.३० ला पोचलो. इथे आमच्या ग्रुप लीडरने ट्रेकची संपूर्ण माहिती दिली आणि ९ वाजता आम्ही डोंगर यंगायला सुरुवात केली. सुरवातीलाच जबरदस्त घामटे काढणारी चढाई होती. ऊन खूप होतं पण झाडी खूप असल्यामुळे ते तितकेसे जाणवले नाही. कुठेही जराशी पण सपाट सरळ वाट नव्हती, सतत चढण. पण कुठेही न थांबता आणि पाण्याचा एक थेंबही न पीता, ही चढाई आम्ही १.३० तासात पूर्ण केली.




वर आल्यावर, झाडांच्या सावलीत बसून आधी मनसोक्त पाणी प्यायलो आणि मग पोटपूजा केली. तो पर्यंत मागे राहिलेली मंडळी थोड्या थोड्या वेळाने येत होती. सगळे वर येई पर्यंत थोडी विश्रांती घेतली, फोटो काढले.  वर नजर जाईल तिथपर्यंत झाडी भरलेले पठार होते.  सकाळचे ११ वाजले होते. खाली आमच्या लीडरने सांगितले होते की कोळेश्र्वर पठार आणि कमळगड मधे एक खिंड आहे. तिथं पर्यंत जर आपण ३/३.३० पोचलो तरच कमळगडावर जाऊन येता येईल अन्यथा कमळगड बघण्याचा विचार सोडावा लागेल. म्हणून मग आमच्या वाटेपासून जरा बाजूला असलेल्या कोळेश्र्वर मंदिरात जाण्याचा विचार बाजूला सारला.




इथून पुढे भरगच्च जंगलाने वेढलेले लांबलचक कोळेश्र्वर पठार होते. असंख्य प्रकारची नैसर्गिकरीत्या उंच उंच वाढलेली झाडं होती, वेली होत्या, खूप साऱ्या पांढऱ्या फुलांची पखरण होती, उंचीची तमा न बाळगता वाढलेली कारवीची जंगले होती, लांबवर पसरलेले फर्न वनस्पतीचे जंगल होते, मधूनच पक्षांचे आवाज येत होते. माणसाचा मात्र जराही मागमूस नव्हता. वाटेत एका झर्यावर मस्त थंडगार पाणी प्यायलो आणि आमच्या रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. मी तर अर्धी झालेली बिसलेरी ची बाटली ओतून झऱ्याचे रुचकर थंड पाणी भरून घेतले.



अडीचतास कुठंही ब्रेक न घेता चालत, १.३० वाजता आम्ही धनगर वाडीत पोचलो. डोळ्यांना सुखावणारी, लांबवर पसरलेली सोनेरी, पोपटी गव्हाची शेतं होती. मधोमध त्यांची कौलारू घरं होती. अगदी फोटो परफेक्ट जागा होती, त्यामुळे ह्या ठिकाणी फोटो न काढणारा विरळाच. शेताच्या एका बाजूला खळ्यासाठी मोकळी जागा होती, तिथे सगळ्यांनी डबे उघडुन मस्त पोटपूजा केली. आता २ वाजले होते. पुढचा खिंडी पर्यंतचा टप्पा लवकर पार करायचा होता. मग काय, वेगवान चालीने डोंगर वाटा पार करत, जिथे दोन वाटा दिसतात तिथे मागून येणाऱ्या लोकांसाठी, चुकीची वाट झाडांच्या वाळक्या फांद्यांनी बंद करत, हातातल्या खडूंनी वाटेतल्या दगडांवर योग्य मार्ग दर्शवत, झाडांवर मार्ग दर्शक रीबिनी बांधत,  तास सव्वा तासात खिंडीत पोचलो. (एक लिहायचे राहिले, जोर गावातून आम्ही एक डोंगर मित्र बरोबर घेतला होता जो आम्हाला वाट दाखवत होता).






वाटेत एका ठिकाणाहून, इतक्या वेळाने कमळगडाचे प्रथम दर्शन झाले. खिंडीतून गडावर जाऊन, खिंडीत परत येण्यासाठी दीड तास पुरेसा आहे. वाटेत आधी एक गोरखनाथांचे सुरेख मंदिर लागते आणि पुढे गड चढण्याआधी एकुलती एक झोपडी लागते. इथे राहण्याची/जेवणाची व्यवस्था, तेथील शेतकरी कुटुंब करते.

साधारण ४२०० फूट उंचीच्या ह्या किल्ल्याला प्रवेशद्वार किंवा बुरुज वगेरे असे काहीही नाही. वर जमीन चिरत गेलेले ४०-५० फूट खोल असे एक भुयार आहे, तीच गेरूची किंवा कावेची विहीर. खाली उतरायला पन्नासेक उंच पायऱ्या आहेत. बाजूला एक जाड लोखंडी तार बांधली आहे, ज्याला धरून आपण विहिरीत उतरू शकतो. पायऱ्या ओलसर गेरू मुळे थोड्या घसर्ड्या आहेत. खाली उतरत जाताना थंडावा वाढत जातो.  तळाशी पोचल्यावर बऱ्याच कपारी दिसतात ज्यात गेरुची लाल ओलसर माती दिसते. विहिरीतून वर आल्यावर हात गेरुमुळे लालेलाल होतात.


गडावरून दिसणारा नजरा केवळ अप्रतिम. महाबळेश्वर पाचगणी चा परिसर, भोवतालची अतिशय दाट जंगले, रायरेश्वर चे पठार, केंजळगडचे नयनरम्य दर्शन होते. गडाच्या तिन्ही बाजूंनी धोम धरणाचा तर एका बाजूने बलकवडे धरणाचा जलाशय दिसतो.




वरती अर्धा पाऊण तास थांबून, आलेल्या वाटेने अर्ध्या तासात परत खिंडीत पोचलो. अजुन बरेच लोक येणे बाकी होते. आमच्या वाटाड्याला बरोबर घेऊन, मागच्या लोकांसाठी खडूने/झाडांना मार्ग दर्शक रिबिनी बांधत तासाभरात, बरोब्बर ४.३० वाजता खालच्या नांदवणे गावात पोचलो.



समोर मस्त जलाशय होता. मग काय मस्त थंडगार पाण्याने फ्रेश झालो. काही जणांना डुंबायचा मोह आवरला नाही. बाकीची मंडळी अजुन वरून येत होती. बाजूला एक छोटेसे सुंदर मंदिर होते. दर्शन घेऊन, तिथल्या पारावर निवांत बसलो. आजूबाजूचा परिसर खूपच रमणीय होता. सगळी मंडळी आल्यावर, मस्त गरमागरम चहा घेऊन, ६.३० ला पुण्याकडे मार्गस्थ झालो.

आमचा हा जो ट्रेकिंग ग्रुप आहे, ते बहुतांश घाट वाटांचे ट्रेक करतात. मलाही सह्याद्रीतील घाटवाटा अनुभवायला खूप आवडतात. घाटवाटा बरोबरच तिथले निसर्ग सौंदर्य, वाटावरची जंगलं, प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज, झुळझुळते झरे, त्यांचे थंडगार गोड मिठास पाणी, वाटांवर भेटलेले मदतीसाठी तत्पर असलेले साधे डोंगरातले लोक, त्यांचा आपलेपणा खूप भावतो.

आंबी, काळ आणि वेळवंडी रिव्हर ट्रेल १०.१०.२१

 

आंबी, काळ आणि वेळवंडी रिव्हर ट्रेल १०.१०.२१

 

हा एकदम जबरदस्त तगडा ट्रेक. हा ट्रेक करताना आपल्याला तिन्ही नद्यांच्या खोऱ्यामधून मार्गक्रमणा करावी लागते. नांदेड सिटी, पुणे येथून आमचा शेवटचा  पीकअप घेत आमची Sahyatdri Trekkers Foundation(STF) ची बस सकाळी ४.४५ ला मार्गस्थ झाली. त्याआधी जरा फ्लशबॅक. सकाळी बरोब्बर ४ वाजता माझा मित्र धनंजय, याने मला बाणेरहून त्याच्या motorcycle वर pick up केले. पण आम्ही जेमतेम ५०० मीटर जातो न जातो तोच गाडी पंक्चर झाली (वेळ ४.१५). परत आमच्या सोसायटीत येऊन गाडी लावली आणि cab book केली. ती येई पर्यंत वेळ ४.२५. आमचा नांदेड सिटीचा पीकअप होता ४.४५ चा आणि आमच्या इथून अंतर १६ किमी. म्हणलं आता ट्रेक विसरा, बस जाणार. पण सकाळची वेळ असल्याने, traffic नसल्याने ड्रायव्हर ला request केली गाडी पळवायची. आम्ही कसेबसे वेळेत पीकअप पॉइंटला पोचलो. Cab चे बिल देईपर्यंत बस आली.                                              

                                       



सकाळी पानशेत धरणाच्या बॅकवॉटरवर, अतिशय निसर्गरम्य वातावरणात थोडी फोटोग्राफी करत शिरकोली, तालुका वेल्हे येथे पोचलो तेव्हा सकाळचे ७.३० झाले होते. गावाभोवती अतिशय सुंदर देवराई आहे. येथेच शिरकाई देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. प्रशस्त आवार, नवरात्र असल्यामुळे छान सजवलेले. देवीची मूर्ती देखील अतिशय सुबक आणि सुरेख. STF तर्फे देवीची आरती करून, प्रसाद घेतला. (दरवर्षी नवरात्रात STF चा हा ट्रेक असतो त्यावेळी इथे आरती करूनच ट्रेकची सुरुवात होते). मंदिर परिसरातच नाश्ता करून पुढे मानगाव, ता. वेल्हा इथून ट्रेकला सुरुवात केली तेव्हा सकाळचे सव्वा नऊ झाले होते. 





हा ट्रेक अतिशय तगडा आहे ह्याचे कारण म्हणजे संपूर्ण ट्रेकचे अंतर जरी १३.५ किमी असेल तरी भरपूर चढाई आहे. जवळपास पाच डोंगर पार करावे लागतात. मधे पांच water bodies पण पार कराव्या लागतात. दरम्यान आपण जवळ जवळ हजार अकराशे मीटर्स पर्यंत hike करतो. ह्या ट्रेकचा मार्ग, मानगाव (वेल्हा तालुका)- चांदर- मोहरी- हारपुड असा निसर्ग संपन्न आहे. आमच्या नशिबाने ह्यावर्षी कारवी फुलण्याचा काळ (कारवी दर ७-८ वर्षांनी फुलते) असल्यामुळे  मार्गावर सर्वत्र कारवी फुलली होती. काही झाडे कळ्यांनी लगडलेली होती तर काहीं जांभळ्या फुलांनी. अजुन पावसाळा चालू आहे. पण ऊन पडायला सुरुवात झाली की सगळी फुले फुलतील आणि सगळ्या डोंगरावर/पायवाटांवर जांभळ्या रंगाची उधळण होईल. खूप मनोहारी दृश्य असेल ते. आताही काही वाटांवर कारवीने जांभळ्या कमानी धरल्यात trekkers मंडळी/वाटसरूसाठी. डोंगरमाथ्यावरून दुर्गराज रायगड, त्यावरील जगदीश्र्वराचे मंदिर आणि टकमक टोक ह्यांचे दूरदर्शन होते. कोकणदिवा आणि बंदिगृह लिंगाणा ह्या गडांचेही दर्शन होते.



दुपारी एकदीडच्या सुमारास आम्ही चांदर ह्या गावात पोचलो. तीनचारच झोपडीवजा घरं होती. तिथून एका मुलाने खाली नदीत उतरण्याची पायवाट आम्हाला खालपर्यंत येऊन दाखवली. नदीत खडकांवर बसून, कर्णमधुर खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकत थोडी पोटपूजा केली. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुढे मोहरीकडे चढाई सुरु केली. मधे पावसाला सुरुवात झाली. लगेच रेन जॅकेट्स चढवली. सुदैवाने ह्या ट्रेक मध्ये जळवा नव्हत्या. मोहरीत पोचलो तेव्हा ३.३०/३.४५ झाले होते. ह्या गावातूनच पुढे बोराट्याची अवघड नाळ उतरून लिंगाण्यावर जाता येते.


 


मोहरीत पोचल्याबरोबर इतका जोरदार पाऊस सुरू झाला की आता पुढे लागणाऱ्या ओढ्याला/नदीला भरपूर पाणी लागणार होते. अजुन अश्या ३ वॉटरबॉडीज आम्हाला पार करायच्या होत्या. पाऊस मेघगर्जनेसह तासभर चालू होता. आम्ही डोंगर माथ्यावरच्या जोरदार पावसात, अगदी अरुंद पायवाटेने आणि दोन्ही बाजूला असलेल्या भरगच्च कारवीतून उतरायला सुरुवात केली. वाट अतिशय अडचणीची होती. बरेचसे लोक इथे घसरले. जंगलात वरून कोसळणाऱ्या पावसाचा आणि खाली वाहत असलेल्या पाण्याचा घनघोर आवाज आसमंतात घुमत होता. कारवीच्या, वाऱ्यापावसाने तुटलेल्या फांद्या उतरताना आडकाठी आणत होत्या, पाठीला/चेहऱ्याला फटकारे मारत होत्या. डोक्यावर पावसाचा तडंमताशा चालू होता. डोंगरांमधून वाहणाऱ्या असंख्य ओहोळांनी आता धबधब्याचे रुप धारण केले होते. मनात भीती वाढत होती खाली नदी/ओढ्याला पाणी वाढण्याची. मागचा २ वर्षापूर्वीच्या पावसाळ्यातल्या दूधसागर ट्रेकच्या आठवणी जाग्या होत होत्या. भाऊंनी दोर बरोबर आणला होताच. (सकाळीच ट्रेक सुरु होण्यापूर्वीच भाऊंनी सांगितले होते की आत्ता जरी लख्ख ऊन असेल तरी दुपारी ३/४ नंतर पाऊस 100% असणार. तेव्हा ज्या लोकांना मोठ्या ट्रेकची सवय नाही त्यांनी इथूनच बसबरोबर डेस्टिनेशनला जावे कारण वाटेतून माघार नाही). पण सुदैवाने तीनही ठिकाणी पाणी फार वाढले नव्हते त्यामुळे दोर लावायची गरज पडली नाही. एकमेकांच्या साह्याने आम्ही ते दोन्ही ओढे आणि वेळवंडी नदी पार केली. शेवटचा छोटासा डोंगर पार करत आम्ही ५ वाजता हारपुड गावात पोचलो. गाव खूप लहानसे. लोकसंख्या दिडएकशे. गावातल्या मंदिरातच गरमागरम पुलाव आणि बुंदी रायता खाऊन वर मस्त चहा पिऊन ६.३० पुण्यासाठी निघालो. ट्रेक खूपच अविस्मरणीय झाला. शारीरिक क्षमतेचा चांगलाच कस लागला. त्यामुळे बसमध्ये मस्त झोप घेत रात्री १०.३० ला पुण्यात पोचलो.

Vivek Phatak